Thursday, June 11, 2009

आणखी पाणीकपात

पाऊस लांबल्यास मुंबईकरांच्या पाणीपुरवठय़ात आणखी कपात?
प्रतिनिधी
मान्सून अद्यापही मुंबईत दाखल झालेला नसल्यामुळे सावधगिरीचा उपाय म्हणून महापालिका प्रशासनाने बुधवारपासून मुंबई आणि उपनगरात १० टक्के पाणीकपात लागू केली आहे. आणखी काही दिवस पाऊस मुंबईत दाखल झाला नाही तर मुंबईकरांना आणखी पाणीकपातीला तोंड द्यावे लागणार आहे. महापालिकेत पुढील आठवडय़ात होणाऱ्या बैठकीत त्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावात जून महिन्याच्या अखेपर्यंत पुरेल, इतका पाणीसाठा शिल्लक असून खबरदारीचा उपाय म्हणून पालिकेने सध्या १० टक्के पाणीकपात लागू केली आहे. मुंबईत मान्सून दाखल कधी होतोय त्याकडे सर्वजण डोळे लावून बसले आहेत. पुढील आठवडय़ातही पाऊस दाखल झाला नाही तर आणखी १० ते १५ टक्के पाणीकपात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही पाणीकपात १५ ते २५ टक्के होईल. मात्र याबाबत पुढील आठवडय़ातच निर्णय घेण्यात येणार आहे.

‘निसर्गाकडून निसर्गाकडे’ पालिकेचे अभियान
प्रतिनिधी
नुकत्याच साजऱ्या झालेल्या पर्यावरण दिनाच्या निमित्ताने बृहन्मुंबई महापालिकेतर्फे पालिकेच्या २४ प्रशासकीय विभागात ‘निसर्गाकडून निसर्गाकडे’ या अभियानाअंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विविध कारणांमुळे होणाऱ्या प्रदूषणासंदर्भात नागरिकांमध्ये जागृती करण्याच्या उद्देशाने हे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. अतिरिक्त महापालिका आयुक्त आर. ए. राजीव यांनी ‘वृक्षारोपण आणि पातळ प्लास्टिकपासून सर्व नागरिकांचा बचाव’ या विषयावर जनजागृती मोहिम आयोजित केली होती. ग्लोबल वॉर्मिगचा धोका आणि मुंबईत विविध मार्गाने होणारे प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहितीही राजीव यांनी दिली. दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठय़ा प्रमाणात झाडे लावण्याची मोहीम महापालिकेतर्फे राबविण्यात येणार आहे, असे राजीव यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment