Sunday, June 14, 2009

महापालिका सज्ज

महापालिका सज्ज
शेखर जोशी
मान्सून अद्याप मुंबई आणि परिसरात दाखल झाला नसला तरी पावसाळ्यात अतिवृष्टी झाली तर उद्भवणाऱ्या पूरपरिस्थीतीला तोंड देण्यासाठी महापालिका प्रशासनही सज्ज झाले आहे. अतिवृष्टी झाली तर करावयाच्या उपाययोजनांबरोबरच सर्वसाधारणपणे पावसाळ्यात जी खबरदारी घेणे आवश्यक असते, त्यासाठीही पालिकेने विविध उपाययोजना केल्या आहेत.
पावसाळा सुरू होण्यापूर्वी मुंबई व उपनगरातील विविध ठिकाणी असलेल्या बंदिस्त व उघडय़ा गटारांतून आणि नाल्यांतून गाळ बाहेर काढण्यात आला आहे. मिठी, पोयसर, ओशिवरा आदी नद्यांमधील गाळ काढण्यात आला आहे. तसेच संरक्षक भिंत बांधणे व अन्य कामे करण्यात आली आहेत. हाजीअली, लव्हग्रोव्ह, इर्ला नाला आदी पातमुखांच्या ठिकाणी पाणी उपसा करणारे अधिक क्षमतेचे उदंचन संच बसविण्यात आले आहेत. रस्त्यावर असलेल्या गटारांची स्वच्छता करण्यासाठी ३५ यंत्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. दादर येथील पर्जन्य जलवाहिन्या विभागाच्या कार्यशाळेत गाळ उपसणारे १२ फायरेक्स, ९ सक्शन, ३ जेटिंग व २ सक्शन कम जेटिंग मशीन्स ठेवण्यात आली आहेत. पूर्व आणि पश्चिम उपनगरांसाठी एक फायरेस्क मशीन ‘एन-पूर्व’ व ‘के-पूर्व’ विभागात ठेवण्यात आली आहे.
अतिवृष्टी झाली तर शहराबरोबरच पूर्व आणि पश्चिम उपनगरात अनेक ठिकाणी पाणी साठते. शहर विभागात पांडुरंग बुधकर मार्ग, ताडदेव, संत गाडगे महाराज चौक-सातरस्ता, करी रोड रेल्वे स्थानक व ना. म. जोशी मार्ग, वरळी नाका, गणपतराव कदम मार्ग, डॉ. ई. मोझेस मार्ग, हिंदूमाता चित्रपटगृह, काळाचौकी तसेच पूर्व व पश्चिम उपनगरात अनुक्रमे अंधेरी सब वे, नवरंग चित्रपटगृह, मीलन सब वे, सहार मार्ग चौक, बंदरकर वाडी, अमृतनगर, वैशाली नगर, मोतीलाल नगर, ठाकूर संकुल, प्रताप नगर, कोकण नगर, लाल बहाद्दूर शास्त्री मार्ग, गव्हाणपाडा गावठाण, विद्याविहार रेल्वे स्थानकाजवळचा परिसर, सुमन नगर, स्वस्तिक चेंबर्स, नेहरू नगर आदी ठिकाणी पावसाचे पाणी साठण्याची शक्यता आहे. या सर्व ठिकाणी पालिका प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना केल्या आहेत. तसेच सखल भागात पावसाचे साठलेले पाणी बाहेर उपसून टाकण्यासाठी १९३ ठिकाणी २११ पंप बसविण्यात आले आहेत. पालिका प्रशासनाने आपत्कालिन नियंत्रण कक्ष सुरू केला आहे. हा कक्ष २४ तास सुरू राहणार असून पालिका आणि अन्य संबंधित यंत्रणांशी ११ हॉटलाइन येथे जोडण्यात आलेल्या आहेत. आपत्कालिन प्रसंगी नागरिकांना १०८ व १९१६ या क्रमांकांवर थेट संपर्क साधावा. प्रशासनातर्फे गेल्या काही वर्षापासून हॅम रेडिओ ऑपरेटर्सची मदत घेण्यात येत आहे. पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे दूरध्वनी किंवा मोबाइल सेवा बंद पडली तर हॅम रेडिओच्या मदतीने मदत करणे व संपर्क साधणे शक्य होते. पालिकेचे २४ प्रशासकीय विभाग त्याद्वारे जोडण्यात आले आहेत. पालिकेच्या नियंत्रण कक्षात उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे.
पालिकेने मुंबई शहर आणि उपनगरातील अग्निशमन केंद्रांच्या इमारतींवर तसेच पालिका मुख्यालय व काही विभाग कार्यालयांवर ३५ स्वयंचलित हवामानदर्शक व पर्जन्यमापक यंत्रे बसवली आहेत. तेथे पडणाऱ्या पावसाची नोंद २४ तास करण्यात येणार असून आपत्कालिन प्रसंगी कोणत्या विभागात किती पाऊस झाला, कोणत्या विभागात पावसाचा जोर वाढत आहे त्याची माहिती अवघ्या १५ मिनिटात पालिका मुख्यालयातील मुख्य नियंत्रण कक्षाला पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे एखाद्या विभागात १५ मिनिटांत २० मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला तर संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित सूचना देऊन उपाययोजना करणे शक्य होणार आहे.
पालिलकेच्या २४ विभाग कार्यालयांतही २० मे २००९ पासून नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले आहेत. सर्व विभाग कार्यालयात दोन जेसीबी व एक डंपर आणि २४ तास कर्मचारी वर्ग ठेवण्यात येणार आहे. ज्या विभागात पाणी साठण्याची शक्यता आहे, त्या ठिकाणी पाण्याचा उपसा करण्यासाठी पंप व कर्मचारी वर्ग उपलब्ध करण्यात येणार आहे. प्रत्येक विभागातील पाच महापालिका शाळांमध्ये तात्पुरती निवारा व्यवस्था करण्यात आली आहे.
अग्निशमन दलही आपत्कालीन परिस्थितीस तोंड देण्यास सज्ज झाले आहे. वांद्रे, वांद्रे-कुर्ला संकुल, कुर्ला, चेंबूर, मरोळ आणि बोरिवली येथे प्रश्नदेशिक नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. या सर्व ठिकाणी बोटी, फ्लोटिंग स्टेचर, जीवरक्षक जॅकेट्स, रेस्क्यू टय़ूब्स आणि अन्य साधनसामग्री व पुरेसे कर्मचारी ठेवण्यात आले आहेत.
पालिका प्रशासनाने पावसाळ्यात पूरस्थितीचा सामना करण्यासाठी जय्यत तयारी केली असली तरी अद्याप पावसाचा पत्ता नाही. मुंबई व परिसरात कधी एकदा पाऊस सुरू होतोय, त्याकडे सर्वाचे डोळे लागले आहेत. सर्वसाधारण पाऊस पडला तर त्याला तोंड देण्यासाठी पालिका प्रशासन सज्ज आहे. परंतु २६ जुलै २००५ साररखी अतिवृष्टी झाली तर मुंबईत पाणी साठणारच, ते रोखणे शक्य नाही. तरीही अशा आणीबाणीच्या परिस्थितीत प्रशासन जास्तीत जास्त प्रयत्न करून पूरपरिस्थितीला तोंड देईल, असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे.
महत्त्वाचे दूरध्वनी क्रमांक
महापालिका मुख्य नियंत्रण कक्ष-१०८, १९१६, २२६९४७२५, २२६९४७२७, २२६९४७११ (फॅक्स)
पोलीस नियंत्रण कक्ष-१००, २२६२००८१, २२६२१८५५
अग्निशमन नियंत्रण कक्ष-१०१, २३०८५९९१, २३०८५९९२ ते ९४.
हवामान विभाग-२२१५०४३१
पश्चिम रेल्वे नियंत्रण कक्ष-२२०१७४२०
मध्य रेल्वे नियंत्रण कक्ष-२३०८१७२५
कोकण रेल्वे नियंत्रण कक्ष-२७५७९९६९
रेल्वे नियंत्रण कक्ष-२३०८१७२५
राज्य पोलीस नियंत्रण कक्ष-२२०२६५६६
एमएमआरडीए नियंत्रण कक्ष-२६५९४१९०
‘बेस्ट’ वाहतूक नियंत्रण कक्ष, वडाळा-२४१४३६११, २४१३६८८३, २४१३७६४५, २४१४६१६२

No comments:

Post a Comment