Friday, May 1, 2009

साहित्यिकानीही केले मतदान

मतदान हा हक्क आणि कर्तव्यसुद्धा
साहित्यिकांनींही केले मतदान
मुंबई, ३० एप्रिल / प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीच्या आज पार पडलेल्या महाराष्ट्रातील तिसऱ्या व शेवटच्या टप्यात बृहन्मुंबईसह ठाणे परिसरात मतदान झाले. आजच्या मतदानात सर्वसामान्य नागरिकांबरोबरच विविध साहित्यिकानीही आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदान हा आपला हक्क आणि कर्तव्य असल्यानेच आपण दरवेळी न चुकता मतदान करतो, असे साहित्यिकांकडून सांगण्यात आले.
मी आणि माझे कुटुंबीय महापालिकेसह, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी दरवेळी मतदान करतो. आजही आम्ही मतदान केले. मतदान हा आपला हक्क आणि कर्तव्य आहे, मी जेथे राहतो ते ‘साहित्य सहवास’ वांद्रे (पश्चिम) येथे असून हा भाग उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदार संघात येतो. एमआयजी क्लबजवळील नवजीवन शाळेत आमचे मतदान केंद्र होते. मी सकाळी अकराच्या सुमारास मतदानाला गेलो होतो. त्यावेळेस संमिश्र प्रतिसाद दिसून आल्याचे ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. सुभाष भेंडे यांनी सांगितले.
साहित्य सहवासाच्या एकूण नऊ इमारती असून तेथे ८२ फ्लॅट्स आहेत. आमच्या येथील सर्वचजण दरवेळी न चुकता मतदान करतात. आमच्या मतदार संघात किंवा आम्ही राहतो त्या परिसरात मिठी नदी आणि त्याच्या सभोवतालची बेकायदा बांधकामे, कलानगर येथील जंक्शनवरील वाहतूक व्यवस्थेचा गोंधळ आदी काही प्रमुख प्रश्न आहेत. आमच्या येथून जो कोणी खासदार म्हणून निवडून येईल, त्याने या प्रश्नांकडे लक्ष द्यावे असेही भेंडे यांनी सांगितले.
ज्येष्ठ कवी िवदा करंदीकर यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी सांगितले की, माझे वय आता नवव्द असून प्रकृतीअस्वाथ्यामुळे मी हल्ली मतदान करत नाही. त्यामुळे मला या विषयावर अधिक काही बोलता येणार नाही.
राज्य मराठी विकास संस्थेच्या संचालिका वसुंधरा पेंडसे-नाईक म्हणाल्या की, मी आणि माझ्या पतींनी दक्षिण मुंबईत वनिता विश्राम शाळा येतील मतदान केंद्रात मतदान केले. सकाळी साडेअकराच्या सुमारास मतदानाला गेलो असता त्यावेळेस गुजराथी भाषिक जास्त संख्येने मतदानाला आलेले दिसले. दक्षिण मुंबईतील जुन्या चाळींचा पुनर्विकास, बंद होणाऱ्या गिरण्या व त्यातील कामगार, वाहतूक कोंडी आदी प्रश्न महत्वाचे असून निवडून आलेल्या भावी खासदाराने या प्रश्नांकडे लक्ष द्यावे. भावी खासदाराला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रश्नांची जाण असावी. हे प्रश्न सोडविण्यासाठी त्याने सक्रिय असावे, असे वाटते. तर ज्येष्ठ कवी मंगेश पाडगाकर यांनी सांगितले की, मी प्रत्येक निवडणुकीला न चुकता मतदान करतो. आजही ककाळी मी मतदान करून आलो. मी शीव येथे राहतो. दक्षिण मध्य मुंबई हा आमचा लोकसभा मतदार संघ असून माझ्या घराजवळ असलेल्या महापालिकेच्या शाळेतील मतदान केंद्रात मी मतदान केले. कोण निवडून येईल, ते सांगता येणार नाही.

No comments:

Post a Comment