वक्ता दशसहस्त्रेषु’
मुंबई, ३ मे / प्रतिनिधी
ज्येष्ठ साहित्यिक प्रा. राम शेवाळकर यांच्या निधनाने मुंबईतील साहित्य-सांस्कृतिक क्षेत्रालाही जबरदस्त धक्का बसला आहे. शेवाळकर यांच्या जाण्याने ‘वक्ता दशसहस्त्रेषु’ हरपला आहेच, पण त्याच बरोबर महाराष्ट्र साहित्य, संस्कृती, संतसाहित्याच्या व्यासंगी अभ्यासकाला मुकला असल्याची सार्वत्रिक भावना व्यक्त करण्यात येत आहे. सर्वसामान्य साहित्यप्रेमी, वाचकांबरोबरच राजकारण आणि अन्य क्षेत्रातील लोकांनीही शेवाळकर यांना आपली श्रद्धांजली अर्पण केली आहे.
अरुण साधू (ज्येष्ठ साहित्यिक व पत्रकार)- शेवाळकर यांचे निधन ही धक्कादायक बातमी आहे. ते उत्कृष्ट वक्ते, भारतीय व मराठी संस्कृतीचे गाढे अभ्यासक होते. आमचे आणि त्यांच्या कुटुंबाचे जवळचे संबंध होते. ते मला आपला धाकटा भाऊ मानत असत. अत्यंत मनमोकळा स्वभाव आणि खास वऱ्हाडी शैलीतील आदरातिथ्य ही त्यांची वैशिष्टय़े होती.
विद्याधर निमकर (चतुरंग प्रतिष्ठान)- आमच्या चतुरंग प्रतिष्ठान संस्थेचे ते आधारवड होते. संस्था कशी चालवायची आणि ती चालवतांना माणसांना कसे जोडून ठेवायचे, याचा ते एक आदर्श वस्तूपाठ होते. आम्ही वेळोवेळी त्यांचे मार्गदर्शन घेत असू. साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रावर त्यांचा एक आदरयुक्त व प्रेमळ असा दरारा होता. कोणत्याही घटनेतून चांगला अर्थ कसा काढायचा, हे त्यांनीच आम्हाला शिकवले.
डॉ. अरुण टिकेकर (ज्येष्ठ पत्रकार व एशियाटीक सोसायटीचे अध्यक्ष)-शेवाळकर अमोघ वक्तृत्वाची निसर्गदत्त देणगी लाभलेले, संत वाङ्मयाचे भाष्यकार, समाजात टोकाची भूमिका घेणाऱ्यांमध्ये सामंजस्य साधू पाहणारे समन्वयक, ऋजू व्यक्तीमत्वाचे पण चुकणाऱ्याला प्रसंगी चार शब्द सुनावण्याचे सामथ्र्य असलेले आणि साहित्य व संस्कृतीचे व्यासंगी आज आपल्यातून निघून गेले आहेत. हे साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्यांचे मोठे नुकसान आहेच, पण त्याचबरोबर समाजाचेही अपरिमित नुकसान आहे.
प्रा. डॉ. सुभाष भेंडे (ज्येष्ठ साहित्यिक)- शेवाळकर हे संत साहित्याचे गाढे अभ्यासक होते. रसाळ वाणीचा आणि श्रोत्यांना एका जागी खिळवून ठेवणारा वक्ता म्हणून त्यांची चांद्यापासून बांद्यापर्यंत ख्याती होती. त्यांच्या अमोघ वक्तृत्वाने सारे जण मंत्रमुग्ध होऊन जायचे.
नागपूरातील त्यांचे निवासस्थान हे विदर्भातील एक सांस्कृतिक केंद्र होते. त्यांच्या जाण्याने मराठी साहित्य व संस्कृतीची कधीही भरून येणार नाही, अशी हानी झाली आहे.
प्रा. के. ज. पुरोहित (जेष्ठ साहित्यिक)- मी त्यांच्याकडून खूप काही शिकलो. त्यांचे वाचन अखंड होते. संस्था कशी वाढवावी आणि माणसे कशी जोडावीत, हे त्यांच्याकडून शिकण्यासारखे होते. त्यांच्या निधनाने आपण सांस्कृतिक क्षेत्राचा फार मोठा आधार गमावला आहे.
राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची श्रद्धांजली
सुशीलकुमार शिंदे (केंद्रीय ऊर्जामंत्री)- शेवाळकर हे विचारवंत आणि बुद्धीवंत होते. मराठी साहित्य व भाषेसाठी त्यांनी दिलेले योगदान फार मोठे आहे. त्यांच्या अमोघ वक्तृत्वाने युवकांना प्रेरणा मिळायची तर सर्वसामान्य लोकांना त्यांचे वकृत्व विचार करायला लावायचे.
नितीन गडकरी (भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष)- शेवाळकर आणि आमचे कौटुंबीक संबंध होते. ते विदर्भाचा अभिमान आणि ‘महाराष्ट्र भूषण’ होते. मराठीवर त्यांचे प्रचंड प्रभुत्व होते. सोप्या व सर्वाना सहज समजेल, अशा भाषेत ते लेखन करत असत.
माणिकराव ठाकरे (कॉंग्रेस-आयचे प्रदेशाध्यक्ष)- युवकांसाठी ते प्रेरणादायी व्यक्तीमत्व होते. त्यांच्या निधनाने मराठी साहित्य व संस्कृतीची जी हानी झाली आहे, ती कधीही भरून येणार नाही.
अशोक चव्हाण (मुख्यमंत्री)- ‘वक्ता दशसहस्त्रेषु’ अशी संपूर्ण राज्यात ख्याती प्राप्त केलेले ज्येष्ठ साहित्यिक प्रा. राम शेवाळकर यांच्या निधनाने मराठी साहित्यातील तेजस्वी तारा निखळला आहे. लाखो रसिकांवर त्यांच्या वक्तृत्वाची मोहिनी पडली होती. ज्ञानेश्वरी, रामायण आणि महाभारताच्या निरुपणाला त्यांनी आपल्या प्रतिभेने वेगळ्या उंचीवर पोहोचवले होते.
छगन भुजबळ (उपमुख्यमंत्री)- मराठी साहित्याचा आधारस्तंभ हरपला आहे. मराठी साहित्य व संस्कृती क्षेत्रातील त्यांचा वावर हा अनेकांना आधार देणारा होता. त्यांच्या मतांचा सर्वत्र आदर केला जात असे.
मनोहर जोशी (शिवसेना नेते व लोकसभेचे माजी अध्यक्ष)- शेवाळकर यांच्या निधनाने मराठी शारदेचा सच्चा उपासक आपल्यातून निघून गेला आहे. एक चतुरस्र साहित्यिक म्हणून ते कायमच मराठी वाचकांच्या स्मरणात राहतील. ते माझे वैयक्तिक मित्र असल्याने माझ्या प्रत्येक पुस्तकाच्या प्रकाशनाला ते उपस्थित राहात.
आर. आर. पाटील (माजी उपमुख्यमंत्री)- सामाजिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक संस्था आणि व्यक्तींचे ते आधारस्तंभ होते. उत्तम संघटक, उत्तम लेखक आणि अनुपमवाणी वैभवाचे धनी असेलेले शेवाळकर आज आपल्यात नाहीत.
विलासराव देशमुख (माजी मुख्यमंत्री)- कविता, आत्मकथन, ललित लेखनासह सर्व वाङ्मय प्रकारात त्यांनी आपला स्वत:चा असा वेगळा ठसा उमटवला होता. त्यांना अमोघ वाणीचे वरदान मिळाले होते. त्यांचा नम्र व आगत्यशील स्वभाव आणि वऱ्हाडी आदरातिथ्य कायम स्मरणात राहील. त्यांच्या निधनाने आपण ज्येष्ठ साहित्यिक, व्यासंगी तत्ववेत्ता व विचारवंत आणि उत्तम वक्ता गमावला आहे
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment