Monday, May 4, 2009

प्राणीसंग्रहालय बंद करण्याची मागणी

भायखळा येथील प्राणीसंग्रहालय बंद करण्याची प्राणी संघटनांची मागणी
प्रतिनिधी
भायखळा येथील राणीची बाग अर्थात जिजामाता प्राणीसंग्रहालयातील प्राण्यांची काळजी घेण्याबाबत महापालिका प्रशासन अपयशी ठरले असून त्यामुळे हे प्राणीसंग्रहालय बंद करण्यात यावे, अशी मागणी विविध प्राणीमित्र संघटनांनी केली आहे. या संदर्भात पिपल फॉर एथिकल ट्रिटमेंट ऑफ अॅनिमल्स (पेटा) या संघटनेने केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाला पत्र पाठवले आहे. या प्राणीसंग्रहालयातील एका पाणघोडय़ाचा नुकताच मृत्यू झाला होता.
त्या पाश्र्वभूमीवर ‘पेटा’ने ही मागणी केली आहे. अनेक प्राणीमित्र संघटनांनी त्याला पाठिंबा दर्शवला आहे. या प्राणीसंग्रहालयात प्राण्यांची योग्य ती काळजी घेतली जात नसून त्यांना पाहिजे त्या प्रमाणात नैसर्गिक वातावरण मिळत नाही. पक्ष्यांना मुक्तपणे उडता येत नसल्याची तेथे परिस्थिती आहे. तेथील कर्मचाऱ्यांकडून या प्राण्यांची योग्य ती काळजी घेतली जात नाही, त्यामुळे हे प्राणीसंग्रहालय बंद करण्यात यावे, असे प्राणीमित्र संघटनांचे म्हणणे आहे.
प्राणीसंग्रहालयाच्या अधिकाऱ्यांनी मात्र प्राणीमित्र संघटनांकडून घेण्यात आलेले सर्व आक्षेप फेटाळून लावले आहेत. येथील कर्मचारी प्राणीसंग्रहालयातील प्राण्यांची तसेच प्राणीसंग्रहालयाच्या रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारीही प्राण्यांची योग्य प्रकारे काळजी घेतात, असे या सूत्रांचे म्हणणे आहे.

No comments:

Post a Comment