निषेध!!!
अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करणाऱ्या प्रवृत्तीच्या विरोधात ठराव
शेखर जोशी, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी साहित्यनगरी, महाबळेश्वर, २२ मार्च
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटण्याचे काम समाजातील काही बाह्य़शक्ती करत असून, त्यामुळे व्यक्ती, संस्था आणि समाजाचे खच्चीकरण होत आहे, असे सांगतानाच लेखक-प्रकाशकांनीही आपल्या सामाजिक बांधीलकीचे भान ठेवावे, असा ठराव ८२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आज झालेल्या समारोपाच्या सत्रात मंजूर करण्यात आला. ठरावातील लेखकांबाबतचा मजकूर म्हणजे खुद्द अखिल भारतीय साहित्य महामंडळानेच या संमेलनाचे राजीनामा दिलेले अध्यक्ष डॉ. आनंद यादव यांच्यावरच टीकास्त्र सोडल्याचे मानले जात आहे.
डॉ. आनंद यादव यांच्या ‘संतसूर्य तुकाराम’ या पुस्तकातील काही वाक्यांवरून निर्माण झालेला गदारोळ, वारकरी संप्रदायाची आक्रमक भूमिका, डॉ. आनंद यादव यांचा राजीनामा असे विविध प्रश्न निर्माण होऊन हे संमेलन वादाच्या भोवऱ्यात सापडले होते.
‘८२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पाश्र्वभूमीवर घडलेल्या काही घटना व्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच करणाऱ्या होत्या. या घटना व्यक्ती, संस्था व समाजाचे मनोबल खच्ची करणाऱ्या असून, विशिष्ट गटाचे संघटित बल गैरमार्गाने वापरून ते समाजाचे विघटन करणारे आहे. हे संमेलन अशा प्रवृत्तींचा निषेध करत आहे. मात्र त्याचवेळी लेखक-प्रकाशक यांनीही सामाजिक बांधीलकीचे भान ठेवावे. सर्वाना स्वातंत्र्याचा उपभोग घेण्यासाठी राज्य शासनाने अशा प्रकरणी कार्यवाही करून योग्य ती उपाययोजना करावी,’ असा ठराव मंजूर करण्यात आला. महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील हे या ठरावाचे सूचक असून, आनंद परांजपे हे अनुमोदक आहेत.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment