‘लेखकाने कणाहीन होणे साहित्य-संस्कृतीसाठी लाजीरवाणे’
मुंबई, १९ मार्च / प्रतिनिधी
डॉ. आनंद यादव यांनी आधी आपले अध्यक्षपद शाबूत राखण्यासाठी ‘संतसूर्य तुकाराम’ ही कादंबरी मागे घेतली आणि आता वारकरी संप्रदायाच्या नेत्यांच्या दबावाला बळी पडून अध्यक्षपदही सोडून दिले. लेखकाने एवढे कणाहीन होणे एकूणच साहित्य-संस्कृतीला अत्यंत लाजीरवाणे आहे, असे मत ‘लोकवाङ्मय प्रकाशन गृह’ संस्थेने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे व्यक्त केले आहे.
डॉ. यादव यांचा कादंबरी मागे घेण्याच्या निर्णयाबरोबरच संमेलनाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णयही दुर्दैवी असल्याचे मत व्यक्त करून सतीश काळसेकर यांनी या पत्रकात पुढे म्हटले आहे की, डॉ. यादव आणि वारकरी संप्रदायाचे मठाधिपती दोघेही मराठी सांस्कृतिक विश्वात घातक पायंडे पाडत आहेत. समाजाचा विवेक, सहिष्णुता जागी ठेवण्याची मोलाची कामगिरी पार पाडणाऱ्या वारकरी संप्रदायाच्या आजच्या नेत्यांची लेखकांविरुद्धची, त्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याविरुद्धची दहशतखोर भाषाही तितकीच मान खाली घालायला लावणारी आहे. तुकाराम महाराज यांची संत आणि कवी म्हणून असलेली थोरवी वादातीत आहे. त्यांचे चारित्र्यहनन करणारा मजकूर जर कोणी लेखक आपल्या कादंबरीत लिहित असेल तर त्याला उत्तर देण्याचे, त्याचा अप्रामाणिकपणा उघड करण्याचे इतरही मार्ग असल्याचेही काळसेकर यांनी या पत्रकात म्हटले आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment