Monday, April 20, 2009

दक्षिण मध्य मुंबई मतदार संघातून

मंदीचा तडाखा, त्यात उन्हाचा कडाका
थेट मतदारसंघातून (दक्षिण मध्य मुंबई)
शेखर जोशी / कैलास कोरडे
मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघात ३० एप्रिल रोजी मतदान होणार आहे. मतदानाच्या तारखेपूर्वी ४८ तास अगोदर निवडणूक प्रचार समाप्त होतो. त्यामुळे मुंबईतील सर्व लोकसभा मतदारसंघातील प्रचार २८ तारखेला सायंकाळी पाच वाजता समाप्त होईल. प्रचार संपायला बरेच दिवस शिल्लक असले तरी मुंबईला अद्यापही निवडणूक ज्वर चढलेला दिसत नाही. हा मतदारसंघही त्यास अपवाद नाही. मुंबईतील पारा ४१ अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. मात्र मुंबईतील लोकसभा निवडणुकीचे वातावरण अद्याप तापले नसल्याचे दक्षिण मध्य मुंबईतही सर्वत्र ऐकायला मिळते. त्याची दोन कारणे राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून ऐकायला मिळाली. त्यापैकी एक म्हणजे आचारसंहितेमुळे पोस्टर व बॅनरबाजी पूर्णत: बंद झाली असून, गाडय़ांवर भोंगा लावून किंवा भिंती रंगवून वातावरणनिर्मितीचा जमाना राहिलेला नाही. दुसरे कारण म्हणजे मंदीच्या तडाख्यामुळे आणि उन्हाच्या कडाक्यामुळे कार्यकर्त्यांचा निवडणूक प्रचारातील सहभाग घटला आहे. परिणामी ज्या भागात उमेदवार फिरत असतो, केवळ तेथेच कार्यकर्त्यांची गर्दी पाहायला मिळते. इतर वेळी अगदी पक्ष कार्यालयातही शुकशुकाट असतो.
येत्या दोन-तीन दिवसांत प्रचाराची रणधुमाळी खऱ्या अर्थाने सुरू होईल, असे माटुंगा येथील काँंग्रेसच्या एका कार्यकर्त्यांने सांगितले. त्यामागील कारण विचारले असता तो म्हणाला की, आतापर्यंत केवळ तालुका पातळीवर कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या बैठका आणि मेळावे कार्यकर्त्यांना प्रचारात उतरविण्यासाठी सुरू होते. एकदा का या कार्यकर्त्यांनी प्रचारात उडी घेतली की, निवडणूक प्रचारात आपोआप रंग भरलेले दिसतील. हे खरे असले तरी, याआधी झालेल्या निवडणुकांच्या तुलनेत यावेळी कार्यकर्त्यांचा प्रतिसाद थंडच आहे. दक्षिण-मध्य मुंबईत सर्वच राजकीय पक्षांना हे जाणवत असले, तरी उघडउघड हे सत्य स्वीकारण्यास कुणीही तयार नाही. खासगीत मात्र राजकीय पक्षांचे पदाधिकारी ही बाब मान्य करतात.
मतदारसंघांच्या फेररचनेमुळे दक्षिण-मध्य मुंबई मतदारसंघाचे क्षेत्रही बरेच विस्तारले आहे. दक्षिणेला एलिफिन्स्टन ब्रिजपासून सुरू होणाऱ्या या मतदारसंघात माहीम ते भक्ती पार्क पर्यंतचा शहर हद्दीतील भाग आहे. याखेरीज सुमन नगर ते घाटकोपर नाला आणि अणुशक्ती नगपर्यंत भाग तसेच पूर्व द्रूतगती महामार्गापासून ते माहूलपर्यंतचा भाग या मतदारसंघात आहे. त्यामुळे कोणत्याही उमेदवाराला घरोघरी जाऊन प्रचार करणे शक्य नाही. प्रत्येक इमारतीला भेट देणेही अशक्य आहे. परिणामी पुढील दहा-पंधरा दिवसांत पदयात्रा, रोड शो, जाहीर सभा आणि मेळावे या गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्यात येणार असल्याची ‘स्ट्रॅटेर्जी’ पक्ष कार्यकर्त्यांनी सांगितली. याखेरीज झोपडपट्टय़ा आणि सोसायटय़ांमधील प्रभावशाली मंडळीशी बैठका करण्याकडे लक्ष दिले जाणार आहे. या साऱ्या गोष्टींच्या माध्यमातून वातावरणनिर्मितीची जोरदार तयारी सर्वच पक्षांनी सुरू केली आहे. त्यासाठी प्रत्येक पक्षाच्या कार्यालयात पक्षांच्या चिन्हांचे फलक, झेंडे, कार्यकर्त्यांसाठी टोप्या, मफलर आदींचे ढीग पडलेले दिसत आहेत. प्रत्येक पक्षाकडून कितीही जोरदार तयार असली तरी सर्वसामान्य मतदार अद्यपही गोंधळलेल्या स्थितीत आहेत. आपण कोणत्या मतदारसंघात मोडतो, हेही कित्येकांना ठाऊक नाही.
गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी म्हणजे २००४ मध्ये असलेला उत्तर मध्य मुंबई हा लोकसभा मतदार संघ आता दक्षिण मध्य मुंबई झाला आहे. या मतदारसंघात माहीम, वडाळा, शीव-कोळीवाडा, अणुशक्तीनगर आणि चेंबूर असे पाच विधानसभा मतदार संघ येतात. या मतदार संघात विद्यमान खासदार एकनाथ गायकवाड (कॉंग्रेस), विद्यमान आमदार सुरेश गंभीर (शिवसेना) आणि श्वेता परुळकेर (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) अशी प्रमुख तिरंगी लढत होणार आहे. या प्रत्येक विधानसभा मतदार संघाचा चेहरा वेगवेगळा आहे. मतदार संघांच्या या चेहऱ्याचा व तेथील विविधरंगी वातावरणाचा अनुभव येथे फेरफटका मारताना सहज जाणवतो. दादर, प्रभादेवी आणि माहीम परिसरात मध्यमवर्गीय, उच्चमध्यमवर्गीयांची मोठय़ा प्रमाणात वस्ती आहे. मोठमोठे टॉवर्स, आलिशान बंगले आणि मोठय़ा संख्येतील सहकारी गृहनिर्माण संस्था, शासकीय, निमशासकीय आणि कॉर्पोरेट कार्यालये, शिवाजी पार्क याच मतदार संघात येतात.
गेल्या काही दिवसांत शिवसेना-भाजप युती आणि बहुजन समाज पक्ष यांच्या दोन मोठय़ा सभा येथे झाल्या. लालकृष्ण अडवाणी व मायावती या राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांच्या येथे सभा झाल्या. राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांना मुंबईतील निवडणूक प्रचार संपण्यापूर्वी १९ आणि २६ एप्रिल असे दोन रविवार मिळणार आहेत. शिवसेना-भाजप युती, कॉग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस यांची आघाडी आणि मनसेसह अन्य सर्वच प्रमुख राजकीय पक्ष आणि त्यांच्या उमेदवारांनी सध्या तरी प्रचाराचा सर्व भर हा घरोघरी फिरण्यावर आणि वैयक्तिक संपर्कावर दिला असल्याचे चित्र या मतदार संघात पाहायला मिळाले. चाळी, मोठमोठे टॉवर्स, सहकारी गृहनिर्माण संस्था येथे उमेदवार आणि त्याच्या बरोबरचे कार्यकर्ते फिरत आहेत. काहीजण रेल्वेस्थानक, भाजीमार्केट, महाविद्यालये येथे जाऊनही मतदारांना भेटत आहेत. ‘जसा मतदार तसा प्रचार’ असे सूत्र राजकीय पक्षांनी ठेवले आहे. राजकीय पक्षांच्या महिला शाखा, विद्यार्थी संघटना तसेच काही सामाजिक मंडळे, संस्था यांच्या माध्यमातूनही राजकीय पक्ष निवडणूक प्रचार करताना पाहायला मिळत आहे. या मतदार संघात मोठय़ा प्रमाणात दलित, मुस्लिम व दक्षिण भारतीय मतदार असून मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी राजकीय पक्षांकडून स्टार प्रचारकाच्या जाहीर सभा आयोजित केल्या जात असतात. अद्यापतरी अशा मोठय़ा स्टार प्रचारकांच्या जाहीर सभा झाल्या नसल्या तरी शेवटच्या टप्प्यात त्याला अधिक जोर येईल. ‘मनसे’कडे मराठी नाटय़-चित्रपट व दूरदर्शन मालिकांमधील बरीच कलाकार मंडळी आहेत. मनसेच्या श्वेता परुळेकर यांच्या प्रचारासाठी या मंडळींना शेवटच्या टप्प्यात उतरवले जाईल, असे सांगण्यात येते. मतदार संघातील विविध राजकीय पक्ष कार्यालयांचा कानोसा घेतला असता निवडणुकीच्या तयारीबरोबरच त्या अनुषंगाने येणारी अन्य कामे करण्यात, वेगवेगळ्या जबाबदाऱ्या वाटून देण्याचे काम यापूर्वीच झाले आहे. मतदार याद्यांची तपासणी, आपले किती मतदार त्या दिवशी येऊ शकतात, त्यांना मतदानाला कसे आणायचे, मतदारांचे नाव, मतदान केंद्र आदींचा तपशील काही वर्षांंपूर्वीपर्यंत हाताने लिहून कार्यकर्ते नेऊन द्यायचे. आता हे काम संगणकावर केले आहे. तरुण मतदारांवर एसएमएस तसेच ऑर्कूट आणि अन्य कम्युनिटीच्या माध्यमातून स्र्कॅपद्वारे आपले आवाहन कसे पोहोचवावे, यावरही चर्चा सुरू आहेत. सगळ्यात महत्वाचे म्हणजे ऐन उन्हाळ्यात होणारी ही निवडणूक आणि मे महिन्याच्या सुट्टीमुळे मतदार गावी जाऊ नयेत म्हणून राजकीय पक्ष व त्यांच्या काही प्रमुख कार्यकर्त्यांकडून त्यांची मनधरणी कशी करायची, त्याचीही स्ट्रॅटेजी कार्यालयातून आखली जात आहे.

No comments:

Post a Comment