चित्रपट निर्माते-दिग्दर्शक शक्ती सामंता यांचे निधन
मुंबई, ९ एप्रिल / प्रतिनिधी
‘कटीपतंग’, ‘अमरप्रेम’, ‘आराधना’ आदी अनेक गाजलेल्या चित्रपटांचे निर्माते आणि दिग्दर्शक शक्ती सामंता यांचे आज सायंकाळी सांताक्रूझ येथील निवासस्थानी दीर्घ आजाराने निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. सामंता यांनी आपल्या कारकीर्दीत ४३ चित्रपटांचे दिग्दर्शनही केले होते. त्यात ३७ हिंदी , ६ बंगाली चित्रपटांचा समावेश आहे. प. बंगालमध्ये जन्मलेले सामंता कोलकाता विद्यापीठातून १९४४ मध्ये शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अभिनेता होण्याच्या उद्देशाने मुंबईत आले. रत्नागिरीजवळील दापोली येथे त्यांनी शिक्षक म्हणूनही काही काळ नोकरी केली. १९४८ मध्ये ते सहाय्यक दिग्दर्शक म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत दाखल झाले. १९५४ मध्ये सामंता यांनी ‘बहू’ हा पहिला चित्रपट दिग्दर्शित केला. त्यानंतर ‘इन्स्पेक्टर’, ‘शेरु’, ‘डिटेक्टीव्ह’ आदी चित्रपट दिग्दर्शित केले. पुढे १९५७ मध्ये त्यांनी स्वत:ची ‘शक्ती फिल्म’ ही कंपनी स्थापन केली. त्यांच्या कंपनीचा पहिला चित्रपट ‘हावडा ब्रिज’ हा होता. शक्ती सामंता यांनी ५० ते ६० च्या दशकात शम्मी कपूर, राजेश खन्ना यांच्यासमवेत काम केले. हावरा ब्रिज, कश्मीर की कली, अॅन इव्हीनिंग इन पॅरिस, अमानुष, बरसात की एक रात असे, इन्सान जाग उठा, एक राझ, अनुराग, अजनबी, मेहबुबा, अनुरोध, दि ग्रेट गॅम्बलर, अलग अलग असे अनेक गाजलेले चित्रपट त्यांच्या नावावर जमा आहेत.
सामंता यांना आराधना, अनुराग व अमानुष या चित्रपटांसाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. झी टीव्हीतर्फे त्यांना जीवनगौरव पुरस्कारानेही गौरविण्यात आले होते.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment