स्वरार्थरमणी’ ग्रंथातून उलगडणार किशोरीताईंची गानतपश्चर्या
मुंबई, ३ मार्च / प्रतिनिधी
‘स्वरार्थरमणी’ हा ग्रंथ म्हणजे आजवर मी जे गायले आहे, त्या गाण्यावरचे माझे स्वत:चे चिंतन आहे. अनेक वर्षांच्या अभ्यासातून हा ग्रंथ सिद्ध झाला असल्याचे प्रतिपादन गानसरस्वती किशोरीताई आमोणकर यांनी आज दादर येथे केले. ‘नाटय़संपदा प्रतिष्ठान’ने शिवाजी मंदिर येथील शिवनेरी सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. किशोरीताईंच्या या पुस्तकाचे प्रकाशन येत्या ६ मार्च रोजी ज्येष्ठ रंगकर्मी आणि दिग्दर्शिका विजया मेहता यांच्या हस्ते होणार आहे. त्या निमित्ताने ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. प्रतिष्ठानचे विश्वस्त आणि ज्येष्ठ अभिनेते प्रभाकर पणशीकर, लेखक दाजी पणशीकर या वेळी उपस्थित होते.
लोकांचे मनोरंजन करणे हा संगीताचा मूळ हेतू नसून संगीत हे अलौकिक ज्ञानाचे रूप आहे. संगीत हे आत्मरंजनासाठी आहे. संगीतातून आपल्या आत्म्याशी संवाद साधला गेला पाहिजे. आईच्या गर्भातूनच मी संगीत शिकत आले. आतापर्यंत मी जे काही केले ते कमीच आहे, असे मला वाटते. संगीतातील राग, सूर म्हणजे घराणे नव्हे, असे सांगून त्या म्हणाल्या, की संगीतातील रससिद्धांत शिकणे म्हणजे स्वत:ला विसरून ज्ञानाची आस धरणे आहे. सूर बंद न ठेवता तो प्रवाही ठेवणे हे भारतीय शास्त्रीय संगीताचे मुख्य वैशिष्टय़ आहे.पुस्तकाच्या मनोगतात म्हटल्याप्रमाणे पुस्तकाचा या लेखनाचा बोलविता धनी वेगळाच आहे. अंत:स्फूर्तीने जे मी बोलले त्यातून हे पुस्तक साकारले आहे. आजच्या पिढीतील मुलांना संगीताकडे पाहण्याची नवी दृष्टी मिळावी, हा उद्देश या लेखनामागे असल्याचे आमोणकर यांनी सांगितले. संगीतातील रससिद्धांत म्हणजे काय? रस आणि भाव यांचे स्थान काय? रागातून विशिष्ट रस प्रचित होतो की नाही, अशा अनेक प्रश्नांचा शोध यातून घेण्यात आला, असल्याचेही त्या म्हणाल्या.या वेळी बोलताना प्रभाकर पणशीकर म्हणाले, की साहित्यातील रससिद्धांत संगीताला लावण्याचा यशस्वी प्रयत्न किशोरीताईंनी या ग्रंथाद्वारे केला आहे, तर दाजी पणशीकर यांनी सांगितले, की संगीतशास्त्रातील सैद्धांतिक स्वरूपाचा हा ग्रंथ असून, आजवर असा प्रयत्न कोणी केला नव्हता. साहित्याचे सिद्धांत संगीताला लावता येतात, हे किशोरीताईंनी या ग्रंथातून दाखवून दिले आहे.दादर-माटुंगा येथील यशवंत नाटय़ मंदिरात रात्री आठ वाजता होणारा हा कार्यक्रम रसिकांसाठी खुला आहे. कार्यक्रमाच्या प्रवेशिका उद्यापासून नाटय़गृहावर उपलब्ध असतील. याच कार्यक्रमात विजया मेहता किशोरीताईंची प्रगट मुलाखत घेणार असून, डॉ. सदानंद बोरसे व दाजी पणशीकर हे ग्रंथाविषयी आपले मनोगत व्यक्त करणार आहेत. याच पुस्तकाचा प्रकाशन समारंभ येत्या ९ मार्च रोजी पुण्यात बालगंधर्व रंगमंदिरात संध्याकाळी सहा वाजता होणार आहे.
‘लोकसत्ता’च्या पुणे आवृत्तीचे निवासी संपादक मुकुंद संगोराम आणि संगीताचे अभ्यासक केशव परांजपे हे या वेळी किशोरीताईंची प्रकट मुलाखत घेणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे विश्वस्त अरुण फडके यांनी या वेळी दिली.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment