नॅशनल बुक ट्रस्टच्या चार पुस्तकांचे आज प्रकाशन आणि चर्चासत्र
प्रतिनिधी
नॅशनल बुक ट्रस्ट आणि मुंबई विद्यापीठाचा मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने नॅशनल बुक ट्रस्टच्या सुवर्णजयंती मालिकेअंतर्गत आज चार पुस्तके प्रकाशित केली जाणार आहेत. त्यामध्ये दृश्यांतर : स्वातंत्र्यानंतरची मराठी कविता, परिदृश्य : स्वातंत्र्योत्तर मराठी कथा, भगतसिंग : निवडक भाषणे व लेखन, भगतसिंगांवरचे पोवाडे या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ मुंबई विद्यापीठाच्या कालिना संकुलातील कविवर्य कुसुमाग्रज मराठी भाषा भवनात होणार आहे. दृश्यांतर : स्वातंत्र्यानंतरची मराठी कविता हा चंद्रकान्त पाटील संपादित ग्रंथ आणि परिदृश्य : स्वातंत्र्योत्तर मराठी कथा या निशिकांत ठकार संपादित पुस्तकांचे प्रकाशन सकाळी १० वाजता उद्घाटन डॉ. चंद्रशेखर जहागिरदार यांच्या हस्ते होईल. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय खोले भूषविणार आहेत. त्यानंतर ११ वाजता ‘स्वातंत्र्यानंतरची मराठी कविता’ या विषयावरील परिसंवादात प्रा. नितीन रिंढे, डॉ. रमेश वरखेडे आणि प्रा. वसंत आबाजी डहाके सहभागी होतील. दुपारी २ वाजता होणाऱ्या ‘स्वातंत्र्योत्तर मराठी कथा’ या विषयावरील परिसंवादात डॉ. विलास खोले, प्रा. उदय रोटे आणि डॉ. सुधा जोशी सहभागी होतील. दु. ४.३० वाजता भगतसिंग : निवडक भाषणे व लेखन, भगतसिंगांवरचे पोवाडे या पुस्तकांचे प्रकाशन हाईल. त्यानंतर ‘भगतसिंग आणि २१व्या शतकातील भारत’ या विषयावरील परिसंवादात कॉ. गोविंद पानसरे, डॉ. आनंत तेलतुंबडे व कॉ. दत्ता देसाई सहभागी होतील.
‘जगप्रसिद्ध पुलांच्या कहाण्या’ पुस्तक प्रकाशित
प्रतिनिधी
अमेरिकास्थित अभियंते सुधीर शं. कुलकर्णी लिहिलेल्या ‘जगप्रसिद्ध पुलांच्या कहाण्या’ या पुस्तकाचे प्रकाशन शुक्रवारी प्रभादेवी येथे ‘रचना संसद’च्या सभागृहात एका विशेष कार्यक्रमात करण्यात आले. ग्रंथायन प्रकाशनने हे पुस्तक प्रकाशित केले असून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक जयंत नाशिककर यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
पूल बांधकाम क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या श्रीखंड कन्सल्टन्सी या संस्थेचे कार्यकारी संचालक राजीव श्रीखंडे, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. सुभाष भेंडे, वसंत नरहर फेणे या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पूल आणि त्यांचे बांधकाम अशा वेगळ्या विषयावर मराठीमध्ये हे पुस्तक प्रकाशित झाले असल्याचे श्रीखंडे यांनी सांगितले तर अभियांत्रिकी क्षेत्रातील मंडळींनी आणि विद्यार्थ्यांनी हे पुस्तक जरूर वाचावे. त्यांच्यासाठी ते उपयुक्त असल्याचे मत, नाशिककर यांनी या वेळी बोलताना व्यक्त केले.
पुस्तकाचे लेखक सुधीर कुलकर्णी यांनी आपल्या या पुस्तकाविषयी उपस्थिताना पडद्यावर सचित्र माहिती दिली. सुभाष भेंडे यांचेही या वेळी भाषण झाले. ग्रंथायन प्रकाशनचे पंकज कुरुलकर यांनी ‘ग्रंथायन’च्या विविध उपक्रमांची माहिती या वेळी दिली. ज्योती आंबेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर लाभेश गवळी यांनी आभार मानले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment