साहित्यिकांनी लक्ष्मणरेषा सांभाळावी - अभ्यंकर
शेखर जोशी, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी साहित्यनगरी, महाबळेश्वर, २१ मार्च
संत रामदास स्वामी यांनी सांगितलेल्या ‘अभ्यासोनी प्रकटावे’ या ओवीची आठवण करून देत साहित्यिक मनाला येईल ते लिहितात. आपल्या संस्कृतीमधील श्रद्धास्थानांबाबत विचार, अभ्यास आणि संशोधन केल्याशिवाय लिहू नये. सर्व साहित्यिक, कवींनी लक्ष्मणरेषा सांभाळावी असे आवाहन विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांनी आज येथे केले.
संमेलनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या ‘संत रामदास स्वामी आणि तुकाराम यांच्या साहित्यातील समरसता’ या विषयावरील परिसंवादाचा समारोप करताना ते अध्यक्ष म्हणून बोलत होते. या परिसंवादात रेखा नार्वेकर, डॉ. देवकर्ण मदन व सुनील चिंचोळकर यांनी भाग घेतला होता.
भारत सर्व जगाचे देवघर असून भारतातील विविध जाती, पंथांच्या सर्व संतांनी आपल्या साहित्यातून सामाजिक एकात्मता व राष्ट्रीय एकात्मतेची जपणूक केली आहे. कथा-कादंबरी वाचून आपण अस्वस्थ होतो तर संतसाहित्याचे वाचन केल्याने मनाला स्वस्थता व शांती मिळते. प्रत्येकालाच संतवाङ्मयात आपल्याला जे हवे आहे ते सापडते. संतांचे चिंतन विश्वात्मक असून संत रामदास व तुकाराम या दोघांनीही आपल्या साहित्यातून समाज हिताचा, सामाजिक समरसतेचा व मानवतेचा विचार मांडला आहे, असेही अभ्यंकर म्हणाले.
सुनील चिंचोलकर यांनी सामाजिक समरसता व बांधिलकी हे सर्व संतांचे वैशिष्टय़ असून रामदास व तुकाराम यांच्या साहित्यात ते ओतप्रोत भरले असल्याचे सांगितले. तर डॉ. मदन म्हणाले की, रामदास - तुकोबा यांच्यासह सर्व संतांनी मानवी जीवनातील शाश्वत मूल्यांचा संदेश जगाला दिला. यावेळी रेखा नार्वेकर यांनीही आपले विचार व्यक्त केले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment